Sunday, March 25, 2012

दोषी कॅबिनेट मंत्र्यांविरुद्ध FIR दाखल कराः अण्णा

दोषी कॅबिनेट मंत्र्यांविरुद्ध FIR दाखल कराः अण्णा

मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली 

केंद्र सरकारमधील दोषी मंत्र्यांविरुद्ध येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत एफआयआर दाखल करा अन्यथा देशभर जेलभरो आंदोलन करण्यात येईल असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारला आज दिला. 

केंद्र सरकारने मजबूत लोकपाल आणले असते तर सध्याच्या केंद्र सरकारमधील १४ मंत्री केव्हाच जेलमध्ये गेले असते, असा दावा टीम अण्णाचे सदस्य अरविंद केजरीवाल यांनी केला. जंतरमंतरवर केजरीवाल यांनी हे १४ मत्री कोण आणि त्यांनी कोणते गुन्हे केले आहेत, याचा पाढा सर्वांसमक्ष वाचून दाखविला. यात मंत्र्यांमध्ये केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम, कृषीमंत्री शरद पवार, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री विलासराव देशमुख, ऊर्जा मत्री सुशील कुमार शिंदे, कोळसा मंत्री श्रीप्रकाश जयस्वाल, परराष्ट्र मंत्री एस.एम. कृष्णा, अवजड उद्योग मंत्री प्रफुल्ल पटेल, रस्ते विकास मंत्री कमलनाथ, हवाई वाहतूक मंत्री अजित सिंह, अपारंपरिक ऊर्जा मंत्री फारुख अब्दुल्ला, मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल यांचा घोटाळेबाज मंत्र्यांच्या यादीत समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. 

या मंत्र्यांविरोधात आपण स्वतःहून हे आरोप करत नसून विविध वृत्तपत्रे,. चौकशी समित्या यांनी या मंत्र्यांवर ठपका ठेवला असल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केले. 

अन् अण्णांचे डोळे पाणावले 
केंद्र सरकार बहिरे व आंधळे झाले आहे. देशात काय चाललं आहे याची त्यांना माहिती नाही, असा सरकारवर हल्ला चढवत अण्णा हजारे यांचे रविवारी डोळे पाणावले होते. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी जनलोकपाल आणा, प्रमाणिक अधिकारी व कार्यकर्ते यांची हत्या करणा-यांवर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करा या मागण्यांसाठी अण्णांचे हे आंदोलन आहे. 

भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणा-या अनेक कार्यकर्त्यांचे खून झाले आहेत. जंतरमंतर त्याबाबतचे माहितीपट व चित्रफीतीद्वारे माहिती दाखविण्यात येत होती. समाजसेवक म्हणून काम करणा-या या लोकांच्या कशा निर्घृण हत्या केल्या हे पाहून स्टेजवरच अण्णांचे डोळे पाणावले.

No comments: